बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

नगरची भूमी संतांची. तसेच योद्‌ध्यांचीही. विविध राजवटीच्या रक्ताने माखलेल्या या भूमीचा इतिहासही तसा रक्तरंजीत म्हणावा लागेल. कारण अनेक लढाया या मातीने झेलल्या. अंगाखांद्यावर योद्‌ध्यांनी आपले कसब पणाला लावले. गतप्राण झाले अन्‌ अनेक जिंकलेही. संघर्षमय इतिहास असलेल्या या जिल्ह्याला पौराणिक संदर्भही आहेत. अगदी रामायम, महाभारतापासून ते राष्ट्रकुट वंश, चालुक्‍य, निजामशाही, मराठ्यांचे राज्य, इंग्रजी राजवटीची झालर त्याला आहे. 

पौराणिक संदर्भ 

नगर जिल्ह्याचे पौराणिक संदर्भ पाहिल्यास रामायण, महाभारतात काही संदर्भ जिल्ह्याशी निगडित आहेत. अगस्त्य ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी तीरी वास्तव्य केले. श्रीरामपूर तालुक्‍यातील दायमाबाद येथील उत्खननातून सिंधू संस्कृतीचे अस्तित्व येथे असल्याचे सिद्ध झाले. डोंगरगणमधील श्रीराम, सीतेचे वास्तव्य, महाभारतातील अर्जुन रडल्याने पार्थ-रडी म्हणून नाव पडलेले पाथर्डी याच जिल्ह्यातील. 

नवनाथ संप्रदाय 
नवनाथ संप्रदाय याच जिल्ह्याच्या भूमीत अनेक काळ वास्तव्यास राहिला. गोरक्षनाथांची कर्मभूमी, कानिफनाथांची समाधी याच भूमीत आहे. नाथांनी ठिकठिकाणी वास्तव्य केल्याच्या खूना आहेत. देवादिकांची भूमी म्हणून गर्भगिरी पर्वतराईतील काही भाग नगर जिल्ह्याच्या भूमीचेच अंग आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथांचे वास्तव्य, ज्ञानेश्‍वरीची रचना आदी संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी नगर जिल्हा राज्यभरात प्रसिद्ध आहे. 

सम्राट अशोका - राष्ट्रकुट वंश 
(इ. स. 240 ते 1000) 

सम्राट अशोकाच्या काळात (इ. स. 240) पैठणजवळील महत्त्वाचे स्थान म्हणून हा प्रांत (नगर) प्रसिद्ध होता. पुढे वाकाटक राजवंश इ. स. 250 च्या दरम्यान होता. त्याची राजधाणी वत्सगुल्म (सध्याचा वासिम जिल्हा) येथे होती. नंतरच्या काळात इ. स. 753 ते 982 दरम्यान राष्ट्रकुट राजवटीतील राजांनी राज्य केले. या काळातील राजा अमोघवर्षा याच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. याच काळात वेरुळच्या लेण्या कोरण्यात आल्या. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतराईत या लेण्या कोरल्या गेल्या. औरंगाबादजवळची वेरुळची लेणी ही राष्ट्रकुट राजांची कला क्षेत्रातील अनुपम देणगी आहे. या गुफेत बौद्ध, हिंदू, जैन धर्मातील देव-देवतांची शिल्पे आहेत. या लेण्यातील 12 ते 34 पर्यंतच्या लेण्यांमध्ये रामेश्‍वर (सिताची नहाणी), दशावतार, कैलास, इंद्रसभा नावांनी काही लेण्या प्रसिद्ध आहेत. त्याच काळाचा संदर्भ डोंगरगण (ता. नगर) येथील रामेश्‍वर (सिताची नहाणी) येथील असावा. तसेच याच काळात करडवाडी (ता. पाथर्डी) येथेही लेणी कोरण्याचा प्रयत्न झाला होता. महादेवाच्या पिंडीच्या आकाराची गुफा आजही आहे. सह्याद्रीची जशी सातमाळ पर्वतरांग आहे. तशीच गर्भगिरी पर्वतरांगही सह्याद्रीचीच शाखा आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगेत त्याच काळात लेण्या कोरण्याचा प्रयत्न झाला असावा. राष्ट्रकुट वंश हा कलाप्रिय होता. राज्याच्या मोठ्या विभागाला राष्ट्र म्हणत. राष्ट्रकुट घराण्याचे तीन घराणे प्रसिद्ध होते. त्यातील तिसरे घराणे औरंगाबाद परिसरात उदयास आले. या घराण्याचा राजा दंतीदुर्ग (इ. स. 758) हा विख्यात होता. त्याने दक्षिण गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ जिंकून 45 वर्षे राज्य केले. 
--- 

यादव - निजामशहा 
(इ. स. 1000 ते 1500) 

पुढे 1190 पर्यंत पुन्हा पश्‍चिमी चालुक्‍य वंशाच्या राजांनी राज्य केले. हरिश्‍चंद्र गडावरील गुहांचे काम, त्यावरील नक्षी त्याच शैलीतील आहे. 
1190 च्या दरम्यान देवगिरी यादवांनी चालुंशी संघर्ष करून मिळविली. 
सध्याचे दौलताबाद (जि. औरंगाबाद) ही यादवांची राजधानी होती. याच 
काळातील यादवांचे मंत्री हेमाडी यांनी मोडी लिपीचा शोध लावला. नगर जिल्ह्यात सुमारे 26 मंदिरे हेमाडपंती आहेत. रतनवाडीचे (अकोले) अमृतेश्‍वराचे मंदिर हे हेमाडपंती बांधकाचा उत्कृष्ठ नमुना होय. त्यांचे अस्तित्व आजही आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिताना यादव वंशातील राजा रामदेवराय यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे आढळते. 1294 मध्ये यादवांचा पराभव करून वजीर आदिल खिलजीने राज्य मिळविले. अर्थात हे राज्य मुघल बादशहा जलालुद्दीन खिलजी यांच्या ताब्यात आले. पुढे 1318 पर्यंत मुघल साम्राज्याचा विस्तार होत गेला. 
1338 मध्ये दिल्लीचा बादशहा मोहंमद तुघलकाने दौलताबाद सोडले. राजाविना राज्य झाले. त्यामुळे मंत्र्यांनी लुटालूट केली. त्यातील गंगू ब्राह्मण याचा शिष्य अलादिन हसन गंगू याने सर्वांना हरवून राज्य स्थापन केले. त्यामुळे हे राज्य बहामनी राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. बहामनी राज्याचा काळ मोठा होता. या साम्राज्यातील 13 राजांनी सुमारे दीडशे वर्षे या भूमीवर राज्य केले. त्या काळातही कट-कारस्थाने करण्यात राज्यातील मंत्री कमी नव्हते. 1460 नंतर 1472, 73 मध्ये मोठा दुष्काळ पडला. या आपत्तीचा सामना करण्यात प्रधानमंत्री मोहंमद गवान असफल झाला. लगेचच त्याच्याविरोधात इतर मंत्र्यांनी कारस्थाने रचली. 1487 मध्ये त्याला मारण्यात आले. अंतर्गत बंडाळी वाढून बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यातूनच निघालेल्या मलिक अहमदशहा बिहरी याने 1490 मध्ये सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. तेथेच अहमदनगर वसण्यास सुरवात झाली. अहमदशहाच्या नावावरूनच अहमदनगर हे नाव पडले. 28 मे 1490 रोजी कोटबाग निजाम हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. तो म्हणजे आजचा भुईकोट किल्ला होय. 1494 मध्ये शहर स्थापन झाले. पुढे निजामशहाची राजधानी बनले. 

बुऱ्हाणशहा - चांदबीबी 
(इ. स. 1500 ते 1600) 

1508 मध्ये अहमदशहाचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा पहिला बुऱ्हाणशहा सात वर्षांचा असताना गादीवर आला. त्याचे बहुतेक आयुष्य लढण्यात गेले. 1553 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला पाच मुले होती. त्यातील थोरला मुलगा हुसेनशहा पहिला हा गादीवर आला. या वेळी त्याच्याशी त्याच्या भावांचे भांडण सुरू झाले. याच काळात विजापूर, गोवळकोंडा व विजापूर येथील राजांनी नगरला वेढा दिला. या वेळी तह झाला. पुढील एका लढाईनंतर त्याचा मृत्यू झाला. 
चांदबीबी ही हुसेनशहाचीच मुलगी. तिचा विवाह आदिलशहाशी झाला. 1555 मध्ये चौथा निजाम मुर्तझा हा गादीवर आला. त्याने सलाबतखान (दुसरा) याची वजीर म्हणून नेमणूक केली. सलाबतखानाने नगरला पाण्यासाठी खापरी नळ योजना तयार केली. त्याचे काम पाहून प्रजेला तो आवडत असे. त्यानेच शहा डोंगरावर अष्टकोनी महाल बंधला. चांदबिबीचा महाल म्हणून तो आजही सुस्थितीत आहे. सलाबतखानाच्या मृत्यूनंतर महालात त्याची कबर करण्यात आली. 

चांदबीबी 

चांदबीबी ही अहमदनगरचा निजामशहा पहिला हुसेनशहाची मुलगी. विजापूरच्या पहिल्या आदिलशहाची पत्नी. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की या भाषा अवगत होत्या. आदिलशहाच्या मृत्यूनंतर (1580) आदिलशाहीत अंतर्गत संघर्ष सुरू झाला. सुमारे दहा वर्षे हा संघर्ष चालला. आदिलशाहीची थोडी घडी बसविल्यानंतर चांदबीबी अहमदनगरच्या निजामशाहीत परत आली. हुसेनचा मुलगा मुर्तझा पहिला हा लहानपणीच गादीवर (1586 ते 89) बसला. त्याचा मुलगा मिरनशहा याला गादीवर बसविले. तो व्यसनी असल्याने त्याचा चुलतभाऊ इर्सल शहाला 1589 मध्ये गादीवर बसविले. मुर्तझाच्या बुऱ्हाण नावाच्या भावाचा हा इर्सल शहा मुलगा. इर्सलचा मृत्यू 1594 मध्ये झाल्यानंतर त्याचाच भाऊ इब्राहिम शहाने सूत्रे हाती घेतली. त्याच्या दरबारात दुफळी झाल्याने विजापूरकरांशी त्याचे युद्ध झाले. युद्धात त्याचा मृत्यू झाला. फक्त चारच महिने त्याला राज्य करता आले. त्यानंतर वजीर मियान अंजू याने अहमद नावाचा आपला मुलगा गादीवर बसविला. 1595 मध्ये हा अहमद गादीवर बसला. तो निजामाचा वारीस नव्हता. हा वाद प्रजेत सुरू झाला. त्यामुळे त्याने दिल्लीकर अकबराचा मुलगा मुराद याच्या मदतीने नगरास वेढा दिला. या वेळी अहमदशिवाय इतर तिघेजण निजामशाही राज्यावर आपला हक्क सांगत होते. त्यापैकी बहादूर नावाच्या हक्कदारास चांदबीबीचा पाठिंबा होता. मुरादने वेढा दिला, त्यावेळी चांदबीबीनेही युद्धात भाग घेऊन 1595 मध्येच सत्ता ताब्यात घेतली. चांदबीबीने इब्राहिमचा पुत्र बहादूरशहाला गादीवर बसविले आणि स्वतः कारभार हाती घेतला. तिच्याच राज्यातील महंमद नावाच्या वजिराने मुरादला पुढे करुन तिच्या विरोधात कट कारस्थाने सुरू केली. याच दरम्यान चांदबीबी व वजीर नेहंगखान यांच्यातही वाद सुरू होता. मुराद नगरवर चाल करणार होता; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 1599 मध्ये अकबराने दानियल यास नगरवर चाल करण्यास पाठविले. तो आल्यानंतर चांदबीबीचा वजीर नेहंगखान पळून गेला. त्यामुळे चांदबीबी एकटी पडली. याच काळात हमीद खोजा व त्याच्या मंडळींनी चांदबीबीचा खून केला. त्यामुळे नगरचे राज्य मोगलांना आयतेच मिळाले. बहादूरशहाला अकबराने कैद केले आणि नगरचा कारभार दानियल याच्याकडे 1600 मध्ये सोपविला. 

मुर्तझा - शहाजी राजे 
(इ. स. 1600 ते 1700) 
निजामशाहीतील पहिल्या बुऱ्हाणचा नातू मुर्तझा दुसरा याला निजामशाहीच्या गादीवर (1601) बसविण्यात आले. त्यावेळी निजामशाहीतील सरदार शहाजी राजे, मिआन राजू व मलिकंबर यांनी विशेष पुढाकार घेतला. मलिकंबर व राजू यांच्यात भांडणे होऊन मोगलांनी निजामशाहीवर चाल केली. मलिकंबरने तह करून राज्य राखले. राजधानी नगरहून हलवून दौलताबादला नेण्यात आली. त्याच्या वशिल्याने पुढे बरेच सरदार पुढे आले. मलिकंबरने मोगलांचा पराभव करून नगरचा प्रांत पुन्हा मिळविला. पुढे मुर्तझा व मलिकंबरचे जमेना. त्याने मुर्तझालाच पदच्युत केले. 
1607 मध्ये मलिकंबरने मुर्तझास पदच्युत करून बुऱ्हाण तिसरा यास गादीवर बसविले. एका लढाईत मलिकंबरचा मृत्यू झाला. त्यानंतर फत्तेखान वजीर झाला. फत्तेखानने बुऱ्हाणचा खून करून सर्व राज्यांसह तो मोगलांना शरण गेला. तेव्हा शहाजहानने त्याला जहागिरी दिली. निजामशाही मोगलांच्या ताब्यात होती. फत्तेखानने पुढे मुर्तझा दुसरा याला 1630 मध्ये गादीवर बसविले. निजामशाही मोगलांच्या हवाली केल्याने शहाजीस राग आला होता. त्याने आदिलशहाच्या मदतीने दौलताबादवर हल्ला केला. दौलताबाद जिंकले. त्यामुळे मोगल चिडले. त्यांनी तुंबळ युद्ध करुन दौलताबाद परत घेतले. हुसेनशहा मुर्तझाला पकडून मोगलांनी त्यांना दिल्लीला पाठविले. निजामशाही पुन्हा ताब्यात घेतली. 1633 मध्ये हुसेननंतर शहाजी राजे यांना गादीवर बसविण्यात आले. 
मलिकंबरनंतर शहाजीनेच खऱ्या अर्थाने निजामशाहीची सूत्रे घेतली होती. शहाजीने कोकणासह सर्व प्रांत परत मिळविला व परांड्यास 1634 मध्ये राजधानी केली. शहाजीपुढे डाळ शिजत नसल्याचे पाहून शाहिस्तेखानने शहाजहानला दख्खनमध्ये आणले. शहाजीला त्याने तोंड दिले. पुढेही दीड वर्षे शहाजीने मोगलांशी तोंड दिले. 

भातोडीची लढाई 

1664 मध्ये मुगल शहेनशहाने लष्कर खानला 12 लाखांचे सैन्य देऊन निजामशाही संपविण्यासाठी पाठविले. त्यास आदिलशहा 80 हजारांचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीकडे फक्त 20 हजार सैन्य होते. त्यातीलही दहा हजार सैनिक अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवून दहा हजार सैन्यासह तो लढाईस तयार झाला. 12 लाख सैन्याला पाणी भरपूर लागेल, म्हणून मुगल आणि आदिलशहाच्या सैन्याने उत्तर दक्षिण वाहणाऱ्या मेखरी (सध्या मेहेकरी, चांदबीबीच्या महालाजवळील गाव) नदीजवळ छावणी उभी केली. शहाजी राजांनी उत्तरेकडील धरणाला रात्रीच तडे पाडले. रात्रीच झोपलेल्या सैन्य असलेल्या ठिकाणी पाणी घुसल्याने या छावणीची वाताहत झाली. अनेक योध्यांना शहाजी राजांनी बंदी बनविले. या लढाईत शहाजी राजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. ही भातोडीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. 

मराठे सरदार 
(इ. स. 1700 ते 1800) 

1759 मध्ये मराठ्यांनी जिल्ह्यावर ताबा मिळविला. या काळात पेशव्यांनी मोगलांकडून नगरचा भुईकोट किल्ला ताब्यात घेतला. 1767 मध्ये तोतया सदाशिव भाऊ, 1776 मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्तेयांना किल्ल्यात कैद करण्यात आले होते. 1797 मध्ये भुईकोट किल्ला पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. या शतकात अनेक मराठा सरदारांनी नगरवर राज्य केले. 

इंग्रजांचे राज्य - स्वातंत्र्य संग्राम 
(इ. स. 1800 ते 1947) 
1803 मध्ये जनरल वेलस्लीने नगरच्या माळीवाडा वेशीजवळ शिंद्यांच्या फौजेचा कडवा विरोध मोडीत काढून भुईकोट किल्ल्याला वेढा दिला. आतील शिंदे फौज शरण येत नाही, हे पाहिल्यावर भिंगारच्या देशमुखाला फितूर केले. मोक्‍याची जागा पाहून हल्ला केला. त्यामळे इंग्रजांनी किल्ला जिंकला. तेव्हापासून 1818 पर्यंत इंग्रजांचे महाराष्ट्र जिंकण्यासाठी अहमदनगर हे महत्त्वाचे केंद्र होते
नगर जिल्ह्यातील त्र्यंबकजी डेंगळे, रघूजी भांगरे आदींपासून झुंजार स्वातंत्र्य योद्धांनी प्रदीर्घ लढा चालू ठेवला. 
1818 पासून लढा सुरू होता. विशेषतः 1857 पर्यंत इंग्रजी सत्ता स्थिरस्थावर झाली होती. त्या काळात नगर जिल्ह्यातून त्यांच्या विरोधात नेक नेते तयार होत होते. पेशवाईच्या अखेरच्या अराजकातून सुटका झाल्याबाबत लोकांमध्ये समाधान असले, तरी इंग्रजी अन्यायाविरोधात चीडही निर्माण होत होती. 
1857 च्या बंडाच्या वेळी जिल्ह्यातील उत्तरेकडील बंड करणाऱ्यांना पकडून त्यांचा नायनाट करण्याचा सपाटा इंग्रजांनी लावला होता. त्या काळात संगमनेर, राहुरी, पारनेर आदी भागातील कोळी, भिल्ल समाजाचे लोक शांत बसले नाहीत. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात गुप्तपमे कारवाया चालूच ठेवल्या. त्या काळात भागोजी नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली सात हजारांपेक्षा जास्त युवक संघटित झाले होते
1858 च्या पुढील काळात लोकमान्य टिळकांच्या विचारांनी लोक भारावले होते. नगर जिल्ह्यातील चळवळींनी त्या काळी जोर धरला होता. या काळात बाळासाहेब देशपांडे, रा. ब. चितळे, चौकर आदी मंडळींनी केलेले कार्य गौरवास्पद होते. 1908 मध्ये सेनापती बापट परदेशातून शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतले. पारनेर तालुका ही त्यांची भूमी. त्यांच्यातील क्रांतिकारक त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी पुण्यास जाऊन लोकमान्य टिळकांची भेट घेतल व पुढील दिशा ठरविली. 31 मे 1916 रोजी नगरच्या कापड बाजाराच्या मागील प्रांगणात (इमारत कंपनी) लोकमान्य टिळकांचे व्याख्यान झाले. त्यांच्या भाषणाने भारावून गेलेल्या जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. 1921 नंतरच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. सेनापती दादासाहेब चौधरी, रामभाऊ हिरे, भाई सथ्थ्या, काकासाहेब चिंचोरकर आदी मंडळी या काळात नगर जिल्ह्यातून महत्त्वाचे योगदान देत होती. 1930 मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहात राष्ट्रीय पाठशाळा, पेटिट हायस्कूल (संगमनेर) येथील विद्यार्थ्यांनी योगदान दिले. 1932 मध्ये झालेल्या सत्याग्रहात खुशालचंद बार्शीकर, लक्ष्मण चिंचोरकर, नवलमल फिरोदिया, दिगंबर कस्तुरे, दामोदर गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी काम केले. याच काळातील कायदेभंग सत्याग्रहातही जिल्ह्यातील नेते पुढे होते
1942 च्या चले जाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभीा पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष आदी राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा जगप्रसिद्ध ग्रंथ पंडित नेहरूंनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. पी. सी. घोष यांनी "हिस्टरी ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन' हा ग्रंथ येथेच लिहिला. 
गांधीजींच्या काळात विविध सत्याग्रह झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील नगरसह श्रीरामपूर, पारनेर, श्रीगोंदे, पुणतांबे, पेमगिरी, आश्‍वी, बेलापूर, कोपरगाव, अकोले, बेलपिंपळगाव, बोधेगाव, भिंगार अशा अनेक गावांतील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. 
15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ल्याच्या फत्ते बुरजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. याच किल्ल्यात त्यांना तीन वर्षे स्थानबद्ध करण्यात आले होते. त्याच किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याचे भाग्य त्यांना लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा